संपूर्ण कारकिर्दीतील आगळे-वेगळे वर्ष
पिंपरी – गेल्यावर्षी 23 मार्च पासून पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासूनचा काळ पोलिसांकरिता अत्यंत कसोटीचा ठरला. करोनाशी लढा देताना त्यांनी आपल्या चार सहकाऱ्यांना गमावल. मात्र धीर सोडला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला. त्या दिवशी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात एकही गुन्ह्यांची नोंद झाली नाही. हा एकप्रकारचा इतिहासच म्हणावा लागेल. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी दुसऱ्याच दिवसापासून लॉकडाऊनची घोषणा झाली. तेव्हापासून पोलिसांची खरी कसोटी सुरू झाली.
आमच्या सोसायटीमध्ये बाहेरगावाहून कोणीतरी आले आहे. आमच्या शेजारचा माणूस खोकत आहे, कुठे कंपनी-दुकान सुरू आहे असे कॉल पोलीस नियंत्रण कक्षात खणखणत होते. आलेली माहिती स्थानिक पोलिसांना देऊन त्याचे निवारण करण्यात पोलिसांची दमछाक होत होती. काही नागरिकांचे वर्क फ्राम होम सुरू असताना पोलीस मात्र रस्त्यावर होता. हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार सुरू झाली. यामुळे त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोलिसांनी धान्य वाटप केले.
दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमातून परत आलेल्या नागरिकांची यादी सरकारने महापालिकेला पाठविली. त्यातील काहीजण भूमिगत झाले. अशा नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. सुरुवातीच्या काळात करोनाची प्रचंड भीती आणि अनेक गैरसमज होते. यामुळे करोना झालेल्या व्यक्तीपासून नातेवाईकही दूर झाले. अशावेळी पोलीस त्याचे नातेवाईक बनून त्यास रुग्णालयात दाखल केले.
या काळात दुसऱ्या कोणत्याही आजाराने जरी कोणाचा मृत्यू झाला तरी करोनाच्या भीतीने मृतदेह ताब्यात घेत नव्हते. अशावेळी पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. करोना रुग्ण पळून जाऊ नये म्हणून पीपीपी किट शिवाय रुग्णालयाबाहेर पहारा देणारे पोलिसच होते. रुग्णालयातून पळालेल्या करोना रुग्णाला देखील पोलिसांनीच पुन्हा पकडून रुग्णालयात भरती केले.
हल्ले सहन केले, जेवणही दिले
एकीकडे शहरात करोनाचा कहर सुरू होता तर दुसरीकडे आपल्या गावी जाण्यासाठी मजुरांची धडपड सुरू होती. कोणत्या गावी कोणाला जायचे आहे, याची यादी करण्याचे कामही पोलिसांनीच केले. एवढेच नव्हे तर त्यांना गाडीत बसवून देणे, प्रवासाकरिता त्यांच्या जेवणाची सोय देखील पोलिसांनीच केली. करोना वाढू नये म्हणून महापालिकेने प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण केले. या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर जाण्याची मुभा नव्हती. यामुळे आनंदनगर भागातील नागरिकांनी पोलिसांवर दोनवेळा हल्ले करीत दगडफेक केली. पोलिसांच्या खासगी आणि सरकारी वाहनांचे नुकसानही केले. त्यांना शांत करण्यातही पोलिसांची कसोटी लागली. करोना बाधित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठीही काही नगरसेवकांनी विरोध केला. त्यांनाही कायद्याचा धाक पोलिसांना दाखवावा लागला. संचारबंदीसाठी पोलीस 24 तास रस्त्यावर होते. कामावरून घरी गेल्यावर त्यांना आनंदाने पुढे येणाऱ्या आपल्या लहान मुलांनाही उचलून घेता येत नव्हते.
टवाळखोरांची संख्या अजूनही तितकीच
वारंवार आवाहन करूनही काहीजण विनाकारण रस्त्यावरून फिरत होते. अशा टवाळखोरांना पोलिसांनी काठीप्रसाद दिला. त्यांच्या वाहनांना इंधन देऊ नये, असे परिपत्रकही काढले. टवाळखोरांवर गुन्हे दाखल होऊ लागले. त्यांची वाहनेही जप्त केली. मात्र तरीही टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नव्हती आणि आजही कमी होत नाही. वर्षभरानंतर पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा पोलीस नव्या जोमाने कामासाठी तयार झाला आहे. मात्र गेले वर्ष पोलिसांसाठी कसोटीचा काळ ठरला हे मात्र नक्की.