नवी दिल्ली : आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे असा टोला लगावला. तसेच त्यांनी काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे असेही म्हटले आहे. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले नाना पटोले
‘भाजप सरकारच्या काळात वाटा आणि घाटा सर्व जनतेने पाहिलं आहे. संघाला कशा प्रकारे वाटा पुरवला गेला होता. आणि मंत्रालयात किती आरएसएसची लोक होती लवकरच सरकार याची आकडेवाडी जाहीर करणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘लवकरच मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं’ असं म्हणत त्यांनी फडणवीसांच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.