माजी उपमहापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : शहरातील सुमारे 42 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. तसेच दैनंदिन काम करून हे नागरिक कुटूंबाचे पोट भरतात. मात्र, 20 मार्च नंतर आधी राज्यशासन आणि नंतर केंद्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर या नागरिकांचे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आता या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीनं या आर्थिक दुर्बल घटकांना दहा हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
केंद्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच, शहरातील 50 टक्के पेक्षा अधिक झोपडीधारक भाडयाच्या झोपडीत राहत आहेत. एका बाजूला आता नागरिकांकडे असलेली थोडीफार रक्कम संपली असून त्यांच्यापुढे उपासमार उभी आहे. तर दुसऱ्या बाजूला झोपडीत राहत असताना, झोपडी मालकांकडून भाडयाचा तगादा लावण्यात आला आहे.
त्यामुळे हजारो नागरिकांमध्ये जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यातच, या नागरिकांना रेशनवर केवळ 3 किलो तांदूळ आणि पाच किलो गहू मिळत आहे. झोपडपट्टीमधील कुटूंबातील व्यक्तींची संख्या पाहता हे धान्य आठवडाभरही पुरेल असे चिन्ह नाही. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीनं या शहरी गरिबांसाठी निर्णय घेऊन प्रत्येकास किमान दहा हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी धेंडे यांनी पत्राद्बारे केली आहे.