Amit Shah On Rahul Gandhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली आहे. ते रायबरेली मतदार संघातून मोठ्या फरकाने पराभूत होतील असा दावाही त्यांनी केला.
आदिवासीबहुल छोटा उदायपुर जिल्ह्यातील बोदेली शहरात एका मेळाव्याला संबोधित करताना शहा यांनी विरोधी इंडिया आघाडीवर दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी असलेला आरक्षणाचा कोटा लुटल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून निवडणूक हरल्यावर ते वायनाडला गेले. यावेळी वायनाडमधून हरणार असल्याचे त्यांना समजले आहे, त्यामुळे ते अमेठीऐवजी रायबरेलीमधूनही निवडणूक लढवत आहेत असे ते म्हणाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गांधींनी अमेठी आणि वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. वायनाडमधून ते विजयी झाले, तर अमेठीत ते पराभूत झाले.
अमित शहा म्हणाले की, राहुल बाबा, माझा सल्ला घ्या तुमचा रायबरेलीमधूनही मोठ्या फरकाने पराभव होईल. तुम्ही पळून गेलात तरी लोक तुम्हाला शोधतील. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. पण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला त्यांनी कधीही हात लावला नाही.
भाजपची सत्ता असेपर्यंत कोणी हात लावू शकणार नाही, ही मोदींची हमी आहे असा दावाही त्यांनी केला. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास आरक्षण रद्द करेल हा कॉंग्रेसचा आरोप खोटा आहे असे ते म्हणाले.