नवी दिल्ली/ वॉशिंग्टन – भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फाइव्ह आइज देश भारताच्या विरोधात वातावरण तयार करण्यात सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून स्पष्ट होते आहे. या पाच देशांतील सरकार समर्थक माध्यमे जवळपास दररोजच भारत विरोधी बातम्या प्रसारित करत आहेत. सूत्रांच्या हवाल्याने भारताच्या संदर्भातील नकारात्मक बातम्या दिल्या जात आहेत. भारत सरकारचे नेतृत्व करणारे आणि भारतातील गुप्तचर संस्थांच्या संदर्भातील या बातम्या असतात. (Why is the anti-India atmosphere being created?)
कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे या फाइव्ह आइज गुप्त आघाडीतील चार देश. तेथील सरकार समर्थक माध्यमांनी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या कटात कथितपणे भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. न्यूझिलंड हा या गुप्त आघाडीतील पाचवा देश आहे. या देशांकडून भारताच्या विरोधात एक सुनियोजित रणनीतीद्वारे बातम्या चालवल्या जात असल्याचे गेल्या काही आठवड्यांतील घटनाक्रमावरूनही अधोरेखित होते आहे.
निर्बंध असलेला दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कथितपणे रचलेला कट, ब्रिटनमध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्सचा दहशतवादी अवतार सिंग खांडा याची हत्या, तसेच पाकिस्तानात भारत विरोधी कारवायांत गुंतलेल्या दहशतवाद्यांच्या झालेल्या हत्यांचा संबंध फाइव्ह आइज देशांमधील माध्यमे भारताशी जोडण्याचा प्रयत्न करत असून तशा बातम्या दिल्या जात आहेत. त्यांच्यात आता ऑस्ट्रेलियाही सहभागी झाला आहे. तेथील एबीसी न्यूजने २०२० मध्ये संरक्षण योजना, हवाई तळांवरची सुरक्षा आणि वाणिज्य विषयक क्लासिफाइड माहिती आदींचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय गुप्तचरांवर केला आहे.
अमेरिकेतील एका माध्यम समुहाने तर कोणतेही पुरावे न देता पन्नूच्या हत्येच्या कथित कटात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे माजी सचिव सामंत गोयल यांचे नाव गोवले आहे. भारत सरकार आणि भारताच्या गुप्तचर संस्थांना बदनाम करण्याचा हा एक पध्दतशीर प्रयत्न केला जातो आहे असे या क्षेत्रातील विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय गुप्तचर संस्था फाइव्ह आइज देशांच्या विरोधात गुप्त मोहीम राबवत असल्याचे दावेही संबंधित माध्यमांकडून केले गेले आहेत. अर्थात भारताने हे सगळे आरोप आणि दावे फेटाळले आहेत.मात्र या सगळ्यांत हे देश अचानक भारताच्या विरोधात वातावरण का निर्माण करत आहेत हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठरवून केलेले कारस्थान
विशेषज्ज्ञांच्या मते फाइव्ह आइज देशांच्या गुप्तचर संस्थांनी भारताच्या संस्थांचा सामना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे या बातम्यांवरून स्पष्ट होते आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही असे गंभीर विधान केले आहे की काही देश भारताच्या निवडणुकांमध्ये केवळ रस घेत नसून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. वर नमूद केलेली घटना मालिका पाहता जयशंकर यांच्या दाव्याला एकप्रकारे पुष्टीच मिळते. या सुनियोजित कटाचाच एक भाग म्हणून डोभाल आणि सामंत गोयल यांचे थेट नाव घेण्याचा प्रकार घडला आहे.