Warning | Mumbai | Municipal Corporation | rain – मुंबई लगतच्या किनाऱ्यावर रविवारी रात्रीपर्यंत मोठ्या लाटांची शक्यता असून त्या पाश्र्वभूमीवर लोकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे.
भारतीय हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकरा ते रविवारी रात्री साडे अकरा या वेळेत समुद्रात मोठ्या लाटा उसळतील, त्यामुळे किनारी भागात असलेल्यांना धोका पोहचू शकतो.
या लाटांची उंची दीड मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या अवधीत मच्छिमारांनाही सावधगिरी बाळगावी आणि समुद्रात जाणे टाळावे असेही महापालिकेने म्हटले आहे.
काही अडचण उद्भवली तर नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरीकांना समुद्राच्या जवळ जाण्यापासून रोखावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.