पळसदेव -संपूर्ण जगभरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कलिंगड पिकाला बाजार पेठ, ग्राहक नसल्याने कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे सध्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून कलिंगड फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
इंदापूर तालुक्यातील न्हावी, बोराटवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड लागवड केली आहे. या कलिंगडास अडीच महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपये उत्पादन खर्च आला आणि उत्पादन केवळ 26 हजार रुपयेच मिळाले असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.
कलिंगडासाठी केलेलं सगळं कष्ट कोरोनामुळे माती मोल झालं. दोन एकर क्षेत्रात मोठ्या कष्टाने रातीचा दिवस करून सुमारे 50 टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन काढले. यातून किमान पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र निराशाच पदरी आली. या भागातील काही शेतकऱ्यांनी बेड सोडून मल्चिंग पेपरद्वारे कलिंगडाची लागवड केली आहे.
शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून पिकाची जोपासना केली आहे. प्रथमच शेतात कलिंगड पिकाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता. परंतू आता व्यापारी एक रुपया दोन रुपये किलो दराने कलिंगड मागत आहेत.
त्यामुळे वैतागून आपल्या मालाची झालेली अवहेलना पाहून अगदी माती मोलाने विकण्यापेक्षा गावातील व आसपासच्या नातेवाईकांना वाटप करण्यात येत आहेत. अगदी केलेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शिल्लक असलेले कलिंगड शेतकरी घराजवळ ढीग लावून ठेवत आहेत.
कलिंगडाला एक आणि दोन रुपये भावाने व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कामगारांना मोफत वाटप करून टाकली आहेत. यामुळे कलिंगड शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी.
– अक्का राऊत, कलिंगड उत्पादक शेतकरी, इंदापूर.
शासनाने आमच्या या पिकाचे झालेले नुकसान पाहून किमान आम्हाला झालेला खर्च तरी मिळावा. शिवाय पीक विमा या बाबत या भागातील कृषी सहाय्यक यांच्याकडून कसलीच माहिती मिळत नाही, त्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरी यापुढेही आम्हाला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आम्हाला मदत होईल.
– रामदास बोराटे, कलिंगड उत्पादक शेतकरी, बोराटवाडी.