आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे विजयी सभेत प्रतिपादन
कराड – तुमच्यासारख्या जनतेच्या विश्वासामुळेच इथपर्यंत वाटचाल करू शकलो आहे. आजही मला 1991 चा तो दिवस आठवतो. तेंव्हा नवखा उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आलो होतो. तेंव्हापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली.
आज या स्थानापर्यंत आलेलो आहे. मी कराडकरांचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. हा विजय म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक विजय आहे, असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर येथील दत्त चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर झाला. मात्र या सगळ्यांना तुम्ही धूळ चारलेली आहे. हा पराभव त्यांना लवकर विसरता येणार नाही. जशीजशी निवडणूक हातातून जायला लागली. तशी विरोधकांकडून कारवाई वाढायला लागली. मला प्रतिस्पर्ध्याला नम्र सल्ला द्यायचा आहे की, तुम्हाला जर राजकारण करायचे असेल तर कुठेतरी संयमाने व कोणाच्या तरी विचाराने राजकारण केले पाहिजे. दहशत निर्माण करून, पैशाने व मस्तीने कधी राजकारण होत नाही. यापुढे आणखी पराभवाची तयारी ठेवा.
मला वाटते पहिल्यांदा जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. आणि नंतर जनतेचा आशीर्वाद मागायला आले पाहिजे. आज आपल्याला मागच्यापेक्षा जास्त चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी अजुनही ही लढाई संपलेली नाही. कोणाचेही सरकार आले तरी आपल्याला आपल्या विचाराची ताकत वाढवायची आहे. एकत्र येऊन जातीयवादी ताकतींना लढा द्यायचा आहे. पुढील राजकीय आव्हानांना तोंड द्यायचे आहे त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, अशी आव्हानात्मक सादही त्यांनी यावेळी घातली.