प्रशांत जाधव
शेखर गोरेंची उमेदवारी पथ्यावर; प्रभाकर देशमुखांची लढत कौतुकास्पद
सातारा – जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघात “आमचं ठरलंय’ टीमचा निसटता पराभव करून भाजपच्या जयकुमार गोरेंनी “हॅट्ट्रिक’ केली आहे तर शेखर गोरेंच्या उमेदवारीमुळे प्रभाकर देशमुख यांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंदरीत सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या उमेदवारावर मात करून जयकुमारांनी विजयश्री खेचून आणली. त्यामुळे कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी “किंग’ उसळी घेतली आणि किंगमेकर अयशस्वी ठरले, अशी चर्चा मतदारसंघात आहे.
विधानसभेत गेली दोन टर्म
माण-खटाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जयकुमार गोरेंना यावेळी काहीही झाले तरी विधान भवनाची पायरी चढू द्यायची नाही, असा निर्धार करून माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई, रणजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे या माण व खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार.
दिवंगत सदाशिव पोळ यांच्या दोन्ही मुलांना सोबत घेतले. आता जयकुमार गोरे आमदार होणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार, असे चित्र निर्माण झाले. त्याच वेळी “आमचं ठरलंय’मध्ये उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडली. याचा पुरेपूर
उपयोग जयकुमार गोरेंनी केला. दरम्यानच्या काळात अनेक खलबते झाल्यानंतर “आमचं ठरलंय’मधून प्रभाकर देशमुख यांचे नाव अंतिम झाले. त्यात शेखर गोरे यांना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने ही लढत अटीतटीची झाली.
मात्र, उमेदवार ठरवण्यासाठी लागलेला वेळ अन् प्रचाराला मिळालेला कमी कालावधी, हे प्रभाकर देशमुखांच्या निसटत्या पराभवाचे कारण ठरले. मात्र, हे मुख्य कारण नाही. माण तालुक्यातील मार्डी, गोंदवले, कुकुडवाड या जिल्हा परिषद गटांमधून देशमुखांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही. त्या मानाने आमदारांच्या आंधळी गटाने देशमुखांना सावरले. खटाव तालुक्यातही “आमचं ठरलंय’चे पांडव देशमुख यांना आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले. हीदेखील देशमुखांच्या पराभवाची कारणे आहेत.
उलट जयकुमार गोरेंनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग पेरून त्यांची मतपेढी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक लागल्यापासून जयकुमार गोरेंची देहबोली सकारात्मक होती. त्याचाही मतदारांवर काही अंशी प्रभाव पडला. त्याचबरोबर त्यांनी केलेले डावपेच यशस्वी झाले, शिवाय देशमुखांच्या गटात झालेली बेदिलीही त्यांच्या पथ्यावर पडली. एवढे करूनही जयकुमार गोरेंचा विजय अत्यल्प मताधिक्याने झाल्याने त्यांना यापुढे कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. मागच्या निवडणुकीतील त्यांचे अनेक सोबती आता विरोधात असल्यानेच मताधिक्य प्रचंड घटले आहे. “आमचं ठरलंय’चा प्रयोगदेखील त्यांच्या मताधिक्याला मारक ठरला. देशमुखांनी दिलेली लढत कौतुकास्पद असली तरी सगळे विरोधक एकवटूनही आमदार मीच, हे सिद्ध करणारे जयकुमार गोरेच माणमधील राजकारणाचे हिरो ठरले आहेत.
देशमुखांसाठी “अमृत’ कडू
प्रभाकर देशमुख यांनी दिलेली लढत पाहता त्यांच्या निसटत्या पराभवाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. देशमुखांना माण तालुक्यातून आघाडी मिळाली नाही. त्याचबरोबर खटाव तालुक्यातही गृहीत धरलेली मते त्यांच्या पारड्यात पडली नाहीत. त्यात अपक्ष उमेदवार अमृत सूर्यवंशी यांचे “खाट’ हे चिन्ह व देशमुखांचे “टेबल’ हे चिन्ह यांच्यातील साध्यर्म्यामुळे मतदारांचा संभ्रम झाला असावा. त्यामुळे देशमुखांना “अमृत’ कडू लागले, अशी चर्चा आहे.
स्वकियांनी केला शेखर गोरेंचा घात
काहीही झाले तरी यावेळी आमदार व्हायचंच, असा निर्धार करून शेखर गोरे यांनी कामाला सुरुवात केली होती. मात्र, ज्या प्रचार यंत्रणेच्या जीवावर आमदार होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले, त्याच स्वकियांनी त्यांचा घात केल्याचे बोलले जाते. त्यातच शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंशी हातमिळवणी केल्याचाही आरोप होत आहे. मात्र, हा आरोप शेखर गोरे यांनी फेटाळला आहे.