बाळासाहेब पाटील : सह्याद्रीच्या कार्यस्थळावर विराट विजयी सभा
कराड/कोपर्डेहवेली – स्व. यशवंतराजी चव्हाण यांच्या विचारांना जपणारा कराड उत्तर हा मतदारसंघ आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातील तरुण मतदारांसह महिला व वयस्करांनीही साथ देत सलग पाचव्यांदा आमदार होण्याचा मान दिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. कारखाने काढून आमदार, खासदार होता येत नसते. आणि पैशाच्या जोरावर केलेले राजकारण उपयोगाचे नाही हे आज तुम्ही दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि कारखाना स्थळावर विजयी सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी साथ देवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरविला. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या एकूण बेरजेपेक्षा जास्त मतदान केले. असे सांगत त्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टिकेची तोफ डागली. ते युती शासनाने अपप्रचार करून शेतकरी, नोकरवर्गास काहीही दिलेले नाही.
पैशाच्या जोरावर राजकारण असते तर टाटा पंतप्रधान व बिर्ला राष्ट्रपती झाले असते. आम्ही कारखान्याच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेतला. इतरांनी पैशाची आमिषे दाखवली, पण आम्ही सर्वसामान्यांसाठी कार्य केले. तुम्ही स्वत:साठी काम करत आहात. कारखाना काढला कि आमदार खासदार होता येत नाही. आता विरोधक फक्त हिशोब करत बसतील असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, चंद्रकांत जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, अजित पाटील-चिखलीकर यांचीही भाषणे झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.