सोमाटणे (वार्ताहर) – मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करायचा असेल त्यांना मैदानी खेळ खेळावयास प्रवृत्त करणे काळाची गरज आहे. आजच्या परिस्थितीत शहरातील मुलांबरोबर ग्रामीण भागातील मुलेही मैदानी खेळ विसरत चालली असून बैठ्या गेमकडे वळत आहेत.
विविध मैदानी खेळांमुळे विद्यार्थ्यांची योग्य वयातच चांगली शारीरिक व मानसिक वाढ होते. तसेच वैयक्तिक व सांघिक खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व, निर्णय क्षमता, चातुर्य व सांघिक वृत्तीची वाढ होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुले मैदानी खेळाऐवजी मोबाइलच्या जाळ्यात अडकत आहेत. विटी-दांडू, गोट्या, भोवरा, आंधळी कोशिंबीर, लगोरी, कबड्डी, खो-खो सारखे पूर्वीचे खेळ मोबाइलच्या जमान्यात नामशेष होत आहेत.
जुने खेळ खेळण्यासाठी पैसे खर्च करून महागडे साहित्य खरेदी करण्याचीही गरज नव्हती. उन्हाळा आला की, हे खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. आधुनिक काळात मुले जुने खेळ विसरत चालले आहेत. नवनवीन, बौद्धिक खेळ खेळण्याकडे मुलांचा मोठा ओढा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. परंतु, मराठी मातीतील अस्सल, ग्रामीण भागातील विविध खेळ शरीराला व्यायाम देणारे होते.
मैदानी खेळांच्या जागी आले गेम अन टीव्ही
आता मैदानी खेळांची जागी व्हिडीओ, मोबाइलमधील गेमने घेतली आहे. शिल्लक वेळेत टीव्हीवरील कार्यक्रम आहेत. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मुलेही या खेळात रमली आहेत. त्यामुळे आपोआप मैदानी खेळापासून दूर जावू लागली आहेत.
खेळाडू एकत्रित जमले की खेळ सुरू
मैदानी खेळातील क्रिकेट सोडला तर जुने खेळ टिकवणे काळाची गरज बनली आहे. पूर्वीच्या काळी शहरांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये सुट्या आल्या की मुले गोट्या, विटी-दांडू, भोवरा, शिवणापाणी, कवड्या, लगोरी असे विविध खेळ खेळताना सर्रासपणे दिसून येत.
मामाच्या गावाला जाण्याचा हेतूच खेळ खेळायला मिळायचे
पूर्वी मामाच्या गावी मनमुराद खेळ खेळता यायचे. आजी मनसोक्त लाड करायची त्यामुळे मुल सुट्या कधी लागतात याकडे लक्ष द्यायची. आता मामाच शहरात कामाला आल्याने मुलानाही मामाच्या गावच आकर्षण राहीले नाही.
मैदानी खेळ खेळल्याने शरीराची चपलता वाढते याचा लाभ फक्त शारीरिक वाढीतच होतो असे नाही तर सर्वागीण विकास होण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. मुले मैदानवर यायला लागले की आपोआप त्यांना खेळावेसे वाटते.
– संतोष मेरगळ, क्रीडा शिक्षक तुळजा भवानी विद्यालय सोमाटणे
मैदानावर जावून खेळ खेळल्याने निराशा येत नाही. अडचणीला कसे सामोरे जायचे याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होते. मैदानी खेळामुळे सकारात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढते. खेळामुळे इतरांचे नैराश्य घालवण्याची क्षमता निर्माण होते. – डॉ. नितीनकुमार माळी, शैक्षणिक समुपदेशक