Lok Sabha Election 2024 – सूरत आणि इंदोर या भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील कॉंग्रेस उमेदवारांना स्वताकडे वळवण्याची गरज मोदींना का भासली ते स्वत:च्याच प्रभाव क्षेत्रात इतके असहाय्य आणि घाबरलेले का आहेत असा सवाल काँग्रेसने केला आहे.
या दोन्ही मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवारांना धमकावले गेले, त्यांना नेस्तानबुत करण्याची धमकी दिली गेली असा आरोपही कॉंग्रेसने केला असून ही वेळ मोदींवर कशामुळे आली असा सवाल कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.
काँग्रेसचे इंदूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अक्षय बाम यांनी सोमवारी या मतदारसंघातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या विरोधात एका सतरा वर्षापुर्वीच्या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला गेला होता.
त्या प्रकरणात त्यांचा छळ करण्यात आला आणि धमकाऊन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले असा आरेाप मध्यप्रदेश विधानसभेतील कॉंग्रेसचे नेते जितू पटवारी यांनीही केला आहे. तत्पुर्वी सूरत मधील कॉंग्रेस उमेदवारावर असाच प्रयोग करून त्यांनाही उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले गेले आहे असेही कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
एक्स वरील एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, १९८४ पासून काँग्रेसने सूरत आणि इंदूर लोकसभेच्या जागा जिंकल्या नाहीत. तरीही २०२४ मध्ये दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवारांना धमकावण्यात आले, आणि त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले गेले. भाजपच्या पारंपारिक बालेकिल्ल्यातही पंतप्रधान इतके घाबरलेले का आहेत? असा सवाल त्यांनी केला.