वडगाव मावळ, {किशोर ढोरे} – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील स्थानिक पातळीवरील माजी लोकप्रतिनिधी पुन्हा ‘अच्छे दिन’ आले असून ते सध्या कमालीचे सक्रिय झाले आहेत. उमेदवारांकडून माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी सुरू आहेत. तसेच निवडणुकीच्या कामासाठी स्थानिक पातळीवर त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली असून त्यासाठी नोटपाणीही मिळत आहे.
मावळ तालुक्यात निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महायुती आणि महाआघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र महायुतीतूनही सहयोगी पक्षांकडून विद्यामान खासदारांनी काय काम केले, याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले होते.
राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांसह माजी लोकप्रतिनीधी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे चित्र होते. अनेकांनी त्यांची कार्यालये देखील बंद केली आहेत. कटकट नको म्हणून अनेकांनी नागरिकांचे फोनही उचलणे बंद केले आहे. त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी झाला होता.
पण लोकसभा निवडणुकीमुळे अशा माजी लोकप्रतिनिधींना ‘अच्छे दिन’ आले आहेत. लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी आपली प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अशा प्रभावी माजी लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभागृह अस्तिवात नाही. त्यामुळे प्रशासकीय कारभार सुरू आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतरही निवडणूका लागण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अनेकजण सक्रीय राजकारणांतून बाहेर पडून आपल्या मूळच्या उद्योग, व्यवसायाकडे वळले आहेत. सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे आपल्या भागातील अनेक विकासकामे करताना मर्यादा पडत आहेत. तसेच निवडणुका कधी लागणार याची खात्री नसल्यामुळे नसल्यामुळे अनेकजण सक्रिय राजकारणांपासून दूर राहणे पसंत करीत आहेत. मात्र अशा माजी लोकप्रतिनिधींना मानणारा वर्ग आजही त्या-त्या परिसरात आहे.
प्रचाराच्या निमित्ताने मतदारांसमोर जाण्याची संधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता गती घेतली आहे. १३ मे रोजी मावळ लोकसभेसाठी निवडणुक होणार असल्याने आता प्रचाराला रंगत आली आहे. पण घरोघरी आपल्या उमेदवाराचे चिन्ह पोचविण्यासाठी माजी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. उमेदवारांनाही मतांचे पॉकेट निश्चित करण्यासाठी माजी लोकप्रतिनिधींची गरज भासत आहे.
त्यादृष्टीने उमेदवारांनी अशा प्रभावी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद माजी सदस्य, तालुका पंचायत माजी सदस्य यांचा शोध घेतला असून त्यांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का असेना सक्रिय राजकारणात येत आहेत. उमेदवारांच्या प्रचारात ही मंडळी दिसत आहेत. याच वर्षी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे यानिमित्ताने लोकांसमोर जाण्याची त्यांना संधी मिळणार आहे.