मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केले. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा व्यक्त केली होती. मात्र संजय राऊत यांच्या या विधानावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. माध्यमांशी बोलतांना आज संजय राऊत म्हणाले,’राष्ट्रीय स्तरावरील काही नेते २ युपीए करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्या चिंतेने मी बोलत आहे.’ असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,’ देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा. महाराष्ट्रात सहकारी आहोत. दिल्लीत चर्चा होईल. या विषयावर सोनिया गांधी बोलणार असतील तर आम्ही उत्तर देऊ. या देशात उत्तम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर भाजपचा पराभव कसा करणार याचं उत्तर द्यावे. याचं दिल्लीत येऊन उत्तर द्यावे. महाराष्ट्रात बसून देऊ नये. हा विषय जिल्हा किंवा तालुक्याचा नाही. असं म्हणत त्यानी पुन्हा एकदा शरद पवार देशाचे नेते आहेत. युपीएविषयी बोलण्यासाठी त्यात असलं पाहिजे असं नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे. असे म्हटले आहे.
तत्पूर्वी, युपीएचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांचीही मागणी आहे. आज युपीएही विकलांग अवस्थेत आहे, असेही रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. शरद पवार यांच्या मागे किती आमदार किंवा खासदार आहेत याचा हा प्रश्न नाही. संपूर्ण देशात जितके भाजप सोडून पक्ष आहेत जे आज युपीएमध्ये सामील नाहीत या सर्वांची ही एक मागणी आहे की युपीएचं पुनर्गठन झालं पाहिजे. युपीएच्या नेतृत्वात जर बदल झाले तर युपीए अधिक मजबूत होईल, असेही ते म्हणाले होते.
देशातील विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांचा सहभाग असावा असे वाटत असेल तर युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावं. ही आमची वैयक्तिक मागणी नाही. शरद पवार हे युपीएचे प्रमुख बनतील का नाही हे मी सांगू शकत नाही. मी माझं मत लोकांचं मत सांगितले. आम्ही दिल्लीत एकमेकांना भेटतो त्यावेळी चर्चा होतात. सध्या अधिवेशनही सुरू आहे. यात प्रामुख्यानं युपीएचं पुनर्गठन व्हावं ही चर्चा होत असते. जर तर ज्या गोष्टीत दम नाही. युपीएचं नेतृत्व अशा नेत्याच्या हाती असावं जे बगैर भाजप पक्षांना एकत्र घेऊन संघटना बनवतील,” असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.