वाल्हे -मागील दोन महिन्यांपासून राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विशेषत मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने दूध उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकट ओढावले जाईल या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. गेल्या वर्षी करोना संकटामुळे दूध व्यावसायिकांना फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दुग्ध उत्पादनाचे दर पडल्याने दूध संकलन कमी होवून, दर कमी आला होता. मागील महिन्यापासून करोनाची दुसरी लाट सुरू आहे. अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तर अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहेत. राज्यातील मोठ्या महानगरासह, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात करोनाचा फैलाव होवू लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याबरोबरच इतर देशांमध्येही आता करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने विविध वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दरात घसरण झाली आहे. याचा फटका दूग्ध व्यवसायाला बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीतमुळे वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामधील अनेक शेतकऱ्यांची शेती, शेतामधील उभी पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने पिके कुजून गेली. यामध्ये जनावरांचा हिरवा चारा ही होता. मागील वर्षातील परिस्थितीत पूर्व पदावर येत असतानाच, उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांना हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे.
साखर कारखाने सुरू असल्याने, हिरवा चारा म्हणून शेतकरी 500 रूपये शेकडा दराने उसाचे वाढे उसतोडणी कामगारांकडून खरेदी करीत आहे. तसेच पशुखाद्य, हिरव्या चाऱ्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्पादन खर्चही वाढला आहे, अशा परिस्थितीत दूध दर व्यवस्थित न मिळाल्यास यावर्षीही शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
दर 16 ते 18 रुपयांवर येण्याची भीती
सध्या हॉटेल व्यावसाय तसेच इतर सर्व सुरू असल्याने आजपर्यंत तरी दुधाचे दर टिकून आहेत; मात्र लॉकडाऊन झाले तर नक्कीच दुधाचे दर मागील वर्षासारखे 16 ते 18 रुपयांवर येईल, या भितीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
दूध उत्पादकांना अनुदान द्या
पुढील काही दिवसात लॉकडाऊन लागल्यास त्याचा दूध संकलन आणि दूध दरावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारने दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, अशी मागणी गोपालक पुरस्कार विजेते सुशांत भुजबळ, सतीश भुजबळ आदी दूध उत्पादक शेतकरीवर्गाकडून होत आहे.