सातारा -अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाचा विषय मार्गी लागला. मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी याबाबतची माहिती दिली. कोयना धरण व अभयारण्याग्रस्तांच्या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, आदिती तटकरे व कोयना प्रकल्पग्रस्तांच्यावतीने डॉ. भारत पाटणकर, चैतन्य दळवी, महेश शेलार, मालोजीराव पाटणकर, सचिन कदम आदी उपस्थित होते. जमीन उपलब्ध करून त्याची आकडेवारी जाहीर करणे व गायरान जमीन शेतीलायक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र कार्यालय करून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महानिर्मिती, महावितरण, महापारेषण नोकरीमध्ये कोयना धरणग्रस्तांना विशेष प्राधान्य द्यावे, पुनर्वसन कायद्याप्रमाणे भावाबरोबर बहिणीला स्वतंत्र खातेदार म्हणून गणण्यात येईल. पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव करण्याचे सर्वेक्षण करण्यात यावे, व्याघ्र प्रकल्पाबाबतीत वन समिती व विकास आराखड्याबाबतच्या निधी आदी मागण्या डॉ. भारत पाटणकर यांनी केल्या. नौकाविहाराबाबत तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.