1. भ्रष्टाचार प्रकरण भोवले; ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातून पार्थ चॅटर्जींची हकालपट्टी
भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे गोत्यात आलेले प. बंगालमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची मंत्रिपदाच्या जबाबदारीतून तात्काळ मुक्तता करण्यात आली असल्याचे बंगाल सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
2. 29 कोटी रोख, 5 किलो सोने, शौचालयात लपवला खजिना
अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरात ईडीची कारवाई सुरु
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी पुन्हा कोलकात्यातील तीन ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान ईडीला अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसऱ्या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख आणि 5 किलो सोने मिळाले. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.
3. राष्ट्रपतींबद्दल असभ्य उदगारांवरून संसदेत प्रचंड गदारोळ
कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या संदर्भात केलेल्या असभ्य टिप्पणीमुळे आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. हा लैंगिक भेदभाव करणारा अपमान असल्याची टीका करतानाच चौधरी यांनी तसेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही माफी मागावी अशी मागणी करत कामकाज ठप्प करण्यात आले.
4. चौफेर टीकेनंतर अधीर रंजन यांची माफी
राष्ट्रपतींच्या संदर्भात केलेल्या असभ्य टिप्पणीवर झालेल्या गदारोळानंतर अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे. “विजय चौक येथून राष्ट्रपती भवनकडे मार्च करत असताना आम्हाला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी एका पत्रकाराने आम्हाला विचारले कुठे जायचे आहे. तेव्हा माझ्या तोंडातून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा शब्द आला. ती चूक झाली. मी बंगाली भाषिक माणूस आहे, हिंदी भाषिक नाही. तोंडातून शब्द गेला. हेतू वाईट नव्हता.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
5. सुषमा अंधारेंची शिवसेना उपनेतेपदी निवड
सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांना शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश करताच अंधारे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची शिवसेना उपनेतेपदी निवड केली आहे. सुषमा अंधारे या फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक कार्यकर्त्या असल्याची त्यांची ओळख आहे.
6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला स्थायिक होतात की काय ?
संजय राऊत यांचा खोचक सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. महाराष्ट्राचे “माजी मुख्यमंत्री 4 वेळाही दिल्लीला आले नाहीत. आताचे मुख्यमंत्री 5 वेळा आले. सेनेचे मुख्यमंत्री म्हणून जर कुणी घेत असतील तर सेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत यावं लागलं नाही. सेनेचे हायकमांड मुंबईतच आहेत. ते दिल्लीला स्थायिक होतात की काय अशी परिस्थिती झाली आहे.” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
7. सांगा शेती करायची कशी? शेतकऱ्याने अजित पवारांपुढे मांडली व्यथा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार यांच्याशी बोलताना एका शेतकऱ्याने, शेतकरी हा सर्वकाही दुसऱ्यासाठी करतो पण त्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा अजून जन्मलेलाच नाही असे म्हणत एका शेतकऱ्याने सांगा शेती करायची कशी ? असा सवाल अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला.
8. इराकच्या संसदेमध्ये कट्टरवाद्यांची घुसखोरी
इराण धार्जीण्या पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एका उमेदवाराचे नाव नामनिर्देशित केल्याच्या निषेधार्थ आज इराकच्या संसदेमध्ये कट्टरवादी गटाच्या सदस्यांनी संसदेच्या मुख्य सबागृहामध्ये घुसखोरी केली आणि इराणविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या कट्टरवादी निदर्शकांमध्ये बहुसंख्य शिया मौलवी मुक्तादा अल सद्र यांचे समर्थक होते.
9. पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरूच
डॉलरच्या तुलनेत रुपया 240 वर
पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरूच असून आज डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 240 रुपयांपर्यंत खाली घसरली. कालच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयामध्ये आज 4.48 अंकांनी टक्क्यांनी घट झाली, असे फॉरेक्स असोसिएशन ऑफ पाकिस्तानच्या हवाल्याने पाकिस्तानातील माध्यमांनी म्हटले आहे.
10. आयपीएलचे दोन हंगाम हवे – रवी शास्त्री
एकाच वर्षात दोनदा आयपीएल स्पर्धा खेळवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. सद्यस्थितीत ज्या फॉरमॅटमध्ये आयपीएल खेळवले जात आहे. त्याचप्रमाणे आणखी संघ आणि सामन्यांची संख्या वाढवून ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.