मुंबई – देशासह राज्यात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 43 अंशाचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी तापमान 44 अंशाच्या पुढे देखील गेले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट काही भागात कायम राहणार आहे. अशात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागात पावसाची शक्यता आहे. वातावरणाच्या खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही दक्षिण पुर्व मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात असल्याने काल कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता, मराठवाडा ते विदर्भात काल तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सोबत उष्णतेच्या लाटेचाही इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार, राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम राहणार आहे. तर कोकणातील काही जिल्ह्यात वातावरण उष्ण व दमट राहील. मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व नांदेडला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट तर मराठवड्यातील लातूर, उस्मानाबादला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
सोलापुरात पारा 44.5 अंश पार
राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असून सोलापुरात राज्यातील सर्वाधिक तापमाची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे, तर सोलापुरजवळील जेऊरमध्ये 44.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातही तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईचा पारा 34.1 अंशांवर गेला असून मुंबई उपनगराचे तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील तापमानाचा पारा कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत.