सातारा – गेल्या दहा वर्षात मी केलेल्या विकासकामांचा हिशोब जनतेला देत आहे. मात्र, निष्क्रिय असलेले आणि निवडणुकीच्या तोंडावर उगवणारे भंपक विरोधक जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार आहेत, असा सवाल माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी केला.
खटाव तालुक्यातील दौऱ्यात ते बोलत होते. दरम्यान, जयकुमार गोरे हे उद्या, दि. 3 रोजी दहिवडी येथे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, गोपीचंद पडळकर, महायुतील घटक पक्षांचे तालुकाप्रमुख आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गोरे म्हणाले, प्रत्येक गावाने माझ्यावर टाकलेली विकासाची जबाबदारी मी इमानेइतबारे पार पाडली आहे. गेल्या निवडणुकीत माझ्या विरोधकांना काही गावांनी एक नंबरची मते दिली. मात्र, त्यातील एकही जण त्या गावांमध्ये पुन्हा फिरकला नाही. विरोधक जनतेला गृहीत धरत आहेत. खटाव, माणमधील जनता सूज्ञ आहे. विरोधकांचे मनसुबे जनतेने यशस्वी होऊ दिले नाहीत.
शाश्वत विकास काय असतो, ते जनता पाहत आहे. अहोरात्र परिश्रम करुन 97 गावांमध्ये पाणी पोहोचवले आहे. दोन्ही तालुक्यांमधील 64 गावांचा पाणीप्रश्न जिहे-कठापूर आणि टेंभू योजनेतून मार्गी लावण्यात यश आले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपमध्ये बेडूकउड्या मारणाऱ्या एका भामट्याने दुकानदारीशिवाय काहीच केले नाही, असा टोला त्यांनी लगावला.