Eknath Shinde On Uddhav Thackeray – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसैनिकांचे खुलेआम खच्चीकरण केले जात होते. हे खच्चीकरण थांबवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, आमचा धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हे (बंडखोरी) पाऊल उचलले. हे पाऊल टोकाचे होते, धाडसाचे होते. परंतु आम्ही ते पाऊल उचलले. त्यासाठी हिंमत लागते जी आम्ही दाखवली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीबाबत अनेक खुलासे केले.
शिवसेनेत बंड करून तुम्ही गुजरातमधील सुरत शहरात गेलात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला फोन करून परत बोलावले होते, तुम्ही तिथल्या चहाच्या टपरीवरून त्यांच्याशी बोललात? अशा बातम्या अलिकडे पाहायला मिळाल्या होत्या.
त्याबद्दल काय सांगाल, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही मुंबईवरून बोलत आणि जाहीरपणे गेलो. आम्ही काही लपून छपून गेलो नाही. राहिला प्रश्न परत बोलावण्याचा तर, एकीकडे आम्हाला परत बोलवायचे आणि दुसऱ्या बाजूला आमचे पुतळे जाळायचे, आमची पक्षातून हकालपट्टी करायची, असा सगळा प्रकार चालू होता. त्याचवेळी भाजपच्या नेतृत्वाशी फोनवरून चर्चादेखील केली जात होती.
ते (उद्धव ठाकरे) भाजप नेतृत्वाला म्हणाले, तुम्ही यांना (आम्हाला) कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्याबरोबर येतो. परंतु, भाजप नेतृत्वाने तुम्हाला (ठाकरे गट) त्यांच्याबरोबर घेण्यासाठी तुमच्याकडे काही आहे का? आम्ही गेल्यावर तुमच्याकडे काय राहिले?
यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भाजपबरोबर जाऊन खूश आहात का? त्यावर ते म्हणाले,
आमची भाजपबरोबर अनेक वर्षांपासून वैचारिक युती होती. ही युती शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या सर्वांच्या प्रयत्नांमुळे झाली होती. तीच युती आम्ही केली. ही युती उद्धव ठाकरे यांनी तोडली होती. त्यांनी केलेली चूक आम्ही दुरुस्त केली. आम्ही शिवसेना आणि भाजपची वैचारिक युती पुन्हा केली. त्यामुळे नाराजीचा, नाखुशीचा प्रश्नच येत नाही.