रायपुर – कॉंग्रेस पक्षाचे केंद्रात सरकार आल्यावर आरक्षणाची ५० टक्क्यांची जी सध्या मर्यादा आहे ती हटवली जाईल या आपल्या आश्वासनाचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज छत्तीसगढध्ये पुनरूच्चार केला. राहुल म्हणाले की आताची निवडणूक ही कोणती सामान्य निवडणूक नाही. ही देशाच्या घटनेच्या रक्षणासाठीची निवडणूक आहे.
भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरक्षण बदलायचे आहे, नष्ट करायचे आहे. वंचित समुदायांसाठी नोकऱ्या आणि शिक्षणात जे आरक्षण आहे ते त्यांना समाप्त करायचे असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
ही लोकशाही निवडणूक संविधान, आरक्षण आणि गरिबांचे अधिकार वाचवण्यासाठी आहे. या निवडणुकीत लोकांना जाणीव झाली आहे की या बाबींवर आणि सार्वजनिक उपक्रमांवर हल्ले झाले आहेत.
छत्तीसगढच्या विलासपूर येथील रॅलीत ते घटनेची प्रत हातात घेऊन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय जगातली कोणतीही शक्ती याला नष्ट करू शकत नाही किंवा फाडू शकत नाही. हे केवळ एक पुस्तक नसून ते गरिबांना अधिकार देते, त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्या भवितव्याची देखभाल करते. ते म्हणतात की आम्ही आरक्षण नष्ट करत नाही.
मात्र जेंव्हा ते एखाद्या सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण करतात तेंव्हा आरक्षण संपुष्टात आणत असतात. ठेकेदारी प्रथा लागू करतात तेंव्हा आरक्षण संपवतात. अग्निवीरसारखी योजना आणतात तेंव्हा आरक्षण संपुष्टात आणत असतात.