विकासकामांच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंदा नाही
बारामती/ जळोची – बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करू. गेली 55 वर्षे झालं आम्ही बघतोय अनेकजण येतात, भेटतात. जातात. बारामतीत पंतप्रधान आले. त्यांचेही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे. बारामतीकरांना भेटावे. मात्र, बारामतीकर त्यांना जे हवं आहे. तेच करतात, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो. शेतकरीहिताचे निर्णय घेत नाहीत. असा आरोप केला होता. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, सध्या बारामतीत जी विकासकामे सुरू आहेत. ते टेंडर काढण्यात रस आहे. म्हणून चालली आहेत काय.
बाहेरच्या व्यक्तीने येऊन “उचलली जीभ, लावली टाळ्याला’. हा त्यांचा अधिकार असला तरी त्याला किती महत्त्व द्यायचं, हा बारामतीकरांचा अधिकार आहे. मी ज्या दिवसापासून बारामतीचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. तेव्हापासून आतापर्यंत कोणत्याही कामाच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंदा नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनेक नेते, मंत्री भेटत आहेत. याबाबत पवार म्हणाले की, आपण अनेकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो, ही आपली भारतीय संस्कृती आहे. यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. उलट आनंद आहे. मी आणि राज ठाकरे अनेकदा भेटलो आहोत. राजकीय मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे वैरी नाहीत. मित्रत्वाचे संबंधही असू शकतात.
शिवसेनेच्या गटबाजीमुळे दसरा मेळाव्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही काही काळजी करू नका, सर्वजण खंबीर आहेत. जो तो आपापल्या पक्षाचा विचार करीत असतो.