फुरसुंगी (प्रतिनिधी)- जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजित पवार हे नेहमीच सकारात्मक असतात. त्यामुळे कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी अजित पवार हे खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभे आहेत. त्याचवेळी माझ्याकडूनही केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून तुमच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी परिसरात सुनेत्रा पवार यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचाराचं असेल तर कोणत्याही प्रश्नांची सोडवणुक करणं सहज शक्य होत असल्याचं सांगितलं.
देशाचे भवितव्य सुरक्षित हातात रहावं, यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. त्यासाठी त्यांच्या बाजूने मतदान करणारा खासदार हा आपल्या मतदारसंघातून निवडून जाणं आवश्यक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी आवाहन केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा महायुतीचा भाग आहे. सर्वांनीच हे चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांचे गावकऱ्यांकडून स्वागत
फुरसुंगी येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचारार्थ दौरा असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. सूनेत्रा पवार यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. येणाऱ्या काळात त्या अडचणी आपण सर्व मिळून सोडू, असा विश्वास दिला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.