मुंबई – मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रणावत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. यामुळे हक्कभंग म्हणजे नेमके काय? विधिमंडळाच्या सदस्यांना नेमके कोणते विशेष अधिकार असतात? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे रंजक ठरणार आहे.
खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.
सभागृहाचा हक्कभंग किंवा अवमान झाल्याचा प्रकार सभापतींच्या संमतीने सभागृहाच्या निदर्शनास विधिमंडळ सभासदाकडून तक्रार, विधानसभा सचिवांचा अहवाल, याचिका आणि सभागृह समितीचा अहवालाचा माध्यमातून आणला जाऊ शकतो.
विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. आरोपी तिऱ्हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.
आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.