सातारा – महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने यंत्रणांचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून आघाडी सरकार पाडले. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचे काम भाजपकडून झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदश्चंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील लिंब येथील सभेत केली. सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या तोडीस तोड म्हणून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते चमत्कार करतील, अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ लिंब (ता. सातारा) येथे कोपरा सभेत आ. पाटील बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे भाई जगताप, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, लक्ष्मण माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, दीपक पवार, शिवसेनेचे सचिन मोहिते, जयदीप ननावरे, रवींद्र भणगे, सतीश चव्हाण, सचिन जाधव, धनश्री महाडिक, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत डावरे, दिलीप सावंत, भरत शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, राज्यातील काही मोजकेच लाेक शरद पवार यांना सोडून गेले. ते गेले तरी कार्यकर्ते मात्र गेले नाहीत, त्यामुळे गेलेले नेते आता एकटे पडले आहेत.
भाई जगताप म्हणाले, राहुल गांधी यांनी भारत जोडो आंदोलनातून कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढून लोकांची मने जोडण्याचे काम केले. छोट्या उद्योजकांना बाजूला करून अदानी- अंबानी यांना मोठे करून स्वतः मोठे होण्याची भाजपची विरासत आहे. मुंबईतील उद्योग व्यवसाय गुजरातला नेऊन मुंबईचे महत्व कमी करण्याचे काम मोदी करत आहेत. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राजकीयदृष्ट्या जागृत लिंब गाव माझ्या नेहमीच पाठीशी राहिले. लोकसभा निवडणूक आपल्या हातातून जाऊ लागल्याने मी भ्रष्टाचार केला, असे विरोधक म्हणत आहेत. ते यापूर्वी का बोलत नव्हते. मी चार हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असता तर मीही भाजपमध्ये जाऊन स्वच्छ झालो असतो. मारुती सावंत यांनी प्रास्ताविक केले. नथुराम शिंदे यांनी स्वागत केले. माजी सरपंच सुरेश सोनमळे यांनी सूत्रसंचालन केले, सुनील शिंदे यांनी आभार मानले.
भ्रष्टाचाराचे आरोप असणारांना भाजपमध्ये प्रवेश
सर्वसामान्यांच्या खात्यावर एसएमएसच्या नावाखाली दर महिना १८ रुपये कापले जातात. यातून कोट्यवधी रुपये गोळा करून पुन्हा यातीलच १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकत निव्वळ फसवणूक भाजपप्रणित सरकारकडून होत आहे. या निवडणुकीत माणसाला निवडून पाठवा जो दिल्लीतील संसदेत जाऊन आपले प्रश्न मांडणार आहे. आपला विकास करणार आहे, नाही तर जो दिल्लीत जाऊन कुठे जाईल हे सांगताच येणार नाही, अशांना संधी देऊ नका. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी पक्षात घेऊन भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम भाजपने केले आहे, अशी टीकाही आ. जयंत पाटील यांनी केली.
हे वाचले का ? IPL अवैध स्ट्रीमिंग प्रकरणात अभिनेत्री तमन्ना भाटियाला ‘समन्स’