नगर -मुळा धरणावरुन एमआयडीसी उद्योजकांना होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी लवकरात लवकर मुळा धरणावरून येणारी पाइपलाइनची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांच्याकडे स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष योगेश गलांडे, सचिव आकाश दंडवते, सुनिल देवकुळे, सचिन कांडेकर, स्वप्निल खराडे आदी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांनी शिष्टमंडळास सांगितले की, मुळा धरणावरुन एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला सुमारे 40 वर्षे झाले असून गेल्या 15 दिवसांपासून ठिकठिकाणी वारंवार पाणी योजनेचे पाइप फुटले जात आहेत. त्यामुळे एमआयडीसीमध्ये थेंबभर पाणी शिल्लक नाही. पाणीपुरवठा विभाग हा रात्रंदिवस लिकेज काढण्याचे काम करत आहेत. असून, ही योजना जुनी असल्यामुळे एका ठिकाणचे लिकेज काढल्यानंतर पाणीपुरवटा सुरळित होईपर्यंत दुसऱ्या ठिकाणी लिकेज निर्माण होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग अक्षरश: हतबल झाला आहे.
टॅकर भरण्यासाठी सुद्धा एक थेंब पाणी शिल्लक नाही. तसेच आपल्या संरक्षण विभागाला एमआयडीसी पाइपलाइनवरूनच पाणीपुरवठा केला जातो. त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहे. तरी लवकरात लवकर होणारे लिकेजची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळीत करु. नवीन योजनेला शासनाने मंजुरी दिलेले असून त्याचा निधीही वर्ग झालेला आहे. ठिकठिकाणी पाइप ही येऊन पडले आहेत. परंतु लाइन टाकण्यामध्ये विविध अडचणी निर्माण होत असल्यामुळे नवीन पाणी योजनेच्या कामाला गती मिळत नाही. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मुळा धरणावरून येणारी पाईपलाईनची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नागोजीराव राठोड यांच्याकडे स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली.