मुंबई – एप्रिल महिन्यात कांदा आणि टोमॅटोचे दर वाढले. त्यामुळे या महिन्यात देशभरात शाकाहारी थाळीची किंमत आठ टक्क्यांनी वाढली असल्याचे एका अभ्यासावालात आढळून आले आहे. ब्रॉयलरचे दर कमी झाल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून मांसाहारी थाळीचा दर कमी होत आहे. एप्रिलमध्येही मांसाहारी थाळीचा दर कमी झाला आहे.
क्रिसील या पतमानांकन संस्थेच्या वतीने देशभरातील थाळींच्या दराचा विचार करून हा अभ्यास अहवाल तयार केला जातो. शाकाहारी थाळीमध्ये रोटी, भाजी, भात, डाळ, दही आणि सलाडचा समावेश असतो. एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे भारतामध्ये शाकाहारी थाळीचा जर 27 रुपये 40 पैसे होता असा या संस्थेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळीचा दर 25 रुपये 40 पैसे होता. तर यावर्षी मार्च महिन्यात शाकाहारी थाळीचा दर 27 रुपये 30 पैसे इतका होता.
शाकाहारी थाळीशी संबंधित अनेक घटकाच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याचा दर 41 टक्क्यांनी, टोमॅटोचा दर 40 टक्क्यांनी, बटाट्याचा दर 38 टक्क्यानी, तर तांदळाचा दर 14 टक्क्यांनी वाढला आहे. या महिन्यात डाळिंचा दर 20 टक्क्यांनी वाढला असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
मात्र एप्रिल महिन्यात मिरची, खाद्यतेल आणि मसाल्याच्या किमती अनुक्रमे 31 टक्के, 10 टक्के आणि 40 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये मांसाहारी थाळीचा दर कमी होऊन 56 रुपये 30 पैसे प्रति थाळी इतका झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या थाळीचा दर 58 रुपये 90 पैसे इतका होता. मात्र मार्च 2024 मध्ये मांसाहारी थाळीचा दर 54 रुपये 90 पैसे इतका होता. शाकाहारी थाळीतील सर्व घटक मासांहारी थाळीत असतात फक्त भाजी व डाळीऐवजी चिकनचा समावेश केला जातो.
मांसाहारी थाळी चिकनच्या किमतीला सर्वात जास्त महत्त्व असते. मात्र चिकनची किंमत एप्रिल महिन्यामध्ये 12 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे एकूणच मांसाहारी थाळीचा दर कमी झाला असल्याचा या संस्थेचे म्हणणे आहे.