खालापूर, (वार्ताहर) – उन्हाची प्रखरता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो. त्यामुळे बॉडी डीहायड्रेट होते. शरीरातील ऊर्जाही कमी होते. थकवा व अशक्तपणा जाणवतो. गमावलेली ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी मोसंबी,
कलिंगड, खरबूज, अननस आणि आंबे या मधूर चव असलेल्या रसदार फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे रसाळ फळांना अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. मागणी वाढल्याबरोबरच त्यांच्या किमतीमध्येही जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रसाळ फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. ते शरीरातील पाण्याची गरज भरून काढते. शरिरातील उष्णता कमी करून शीतलता निर्माण करते. सोबतच शरीराला ग्लुकोजही गरज भागवते. या सर्व फळांमध्ये विशेष करून कलिंगडास जास्त मागणी आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये इतरही रसाळ फळांना अधिक मागणी आहे. वजन कमी करण्यासाठी काहीजण डाएट करतात.
त्यामुळे आहारामध्ये फळांचा समावेश अधिक असतो. लहान मुलेही व महिला ही फळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात आहारात घेतात. त्यामुळे फळ विक्रीला सध्या चांगले दिवस आल्याचे विक्रेते सांगत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे पारा ४० अंशावर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाने शरीराची लाहीलाही होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत रसाळ फळांना मागणी वाढू लागली आहे.
कलिंगडाला अधिक मागणी
साधारणतः २० ते ३० रुपये प्रतिकिलोने कलिंगड बाजारात उपलब्ध आहे. या कलिंगडामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते व ऊर्जा निर्माण होते. कलिंगड रसाळ फळांची मागणी वाढल्यामुळे त्यांची आवक ही वाढली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातच कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पूर्वी फळ विक्रेत्यांना दारोदारी फिरावे लागत असे. मात्र आता जागेवर व स्टॉल लावूनही चांगल्यापैकी विक्री होते.