कान्हे, (वार्ताहर) – काही आठवड्यांपासून वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. कार्ला, कान्हे, टाकवे, पवनानगर आदी परिसरात मिरची, टोमॅटो, कलिंगड व कोबीचे पीक या तीव्र उष्णतेमुळे धोक्यात आले आहे.
गर्द झाली असूनही मावळ तालुक्यातील उन्हाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. टोमॅटो, मिरची व कोबीसाठी लाखो रुपये खर्च करून प्रचंड उष्णतेमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. या रोगांमुळे लांब मिरचीचे वाण जागेवरच वळून आखूड झाले आहे. शिवाय पहिला खोडा हाच शेवटचा तोडा ठरल्याने, मिरचीचे पीक सोडून द्यावे लागत आहे.
मिरचीच्या प्लॉटसाठी शेत तयार करण्यापासून रोप, रासायनिक खते, फवारण्या यांसाठी एकरी दीड लाख रुपये खर्च करूनही, उष्णतेच्या लाटेमुळे शेतकऱ्यांना मिरचीचे पीक सोडावे लागत आहे. मिरची तोडणीसाठी लागलेल्या मजुरी इतकेही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पहिला खोडा हाच शेवटचा तोडा निघतोय. मिरची व टोमॅटोची हीच परिस्थिती आहे.
पुरेसे पाणी असूनही वातावरण व तीव्र उष्णतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. टोमॅटोच्या बाबतीतही वाढत्या उष्णतेमुळे झाड सुकल्याने फुलगळ होत नाही, परिणामी टोमॅटोचे उत्पादन थांबते. तालुक्यातील इतर दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र मावळ तालुक्यातही काही भागात मुबलक पाणी असूनही उष्णता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिकांमध्ये योग्य अन्न घटक तयार होण्यास अडचणी येत आहेत