तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले जातात. मात्र तळेगावमध्ये अशास्त्रीय पद्धतीने उभारलेले गतिरोधक अपघातास निमंत्रण देत आहेत. उंच गतिरोधकांमुळे दुचाकीस्वारांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे.
तळेगावमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर उभारलेल्या गतिरोधकांवरील पांढरे पट्टे नाहीसे झाले आहेत. त्यामुळे नवीन वाहनचालकांना ते दिसत नाही. त्यामुळे गतिरोधकावर वाहने आदळत आहे. अशा चुकीच्या गतिरोधकामुळे अनेक अपघातही घडले आहेत, तरीही याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
गतिरोधक बनविताना लांबी-रुंदीचे कसलेही निकष पाळण्यात आलेले नाहीत. नगरपरिषद प्रशासनाने इंडियन रोड काँग्रेसचे नियम व उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत गतिरोधक उभारले आहेत.
यामुळे वाहन चालकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होत आहे. गतिरोधकावरून आदळल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे, असा आरोप वाहन चालक करीत आहेत. तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट असल्याने प्रवाशांना गतिरोधकाचा अंदाज येत नाही.
पांढरे रे पट्टे बुजल्याने रात्रीच्या वेळी ते तर अजिबात लक्षात येत नाहीत. दिवसाही ते व्यवस्थित दिसत नाहीत. चारचाकी वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अपघातात अनेक जण जायबंदी झाले आहेत.
अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर गतिरोधक उभारण्यात येतात. मात्र तळेगावमधील गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. या गतिरोधकांचा धक्का बसून अनेक जणांना मणक्यांचा व पाठीचा त्रास झाला आहे.
पुढे गतिरोधक आहेत असा फलकही काही ठिकाणी नाहीत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी हे गतिरोधक काढून नव्याने शास्त्रशुद्ध पद्धतीचे गतिरोधक उभे करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.