सातारा – जिल्हा परिषदेच्या अखत्यारित होणाऱ्या विकासकामांमध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी विकासकामांचे आता जिओ टॅगिंग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला आगामी चार वर्षात नळ कनेक्शन देण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे गौडा यांनी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेचा पदभार स्विकारल्यानंतर गेल्या तीन आठवड्यात विनय गौडा यांनी विविध विभागांचा आढावा घेवून आपल्या कामाची झलक दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार आणखी पारदर्शक होण्यासाठी पदाधिकारी- अधिकारी यांची सांगड घालून कारभार गतीमान करण्याचा गौडा यांचा प्रयत्न राहणार आहे. सर्वप्रथम गौडा यांनी जिल्हा परिषदेला शिस्त लावण्याचे काम केले आहे. खातेप्रमुखांशी समन्वय साधून प्रशासन आणखी गतिमान करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. पदाधिकाऱ्यांशी समन्वय राखत सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक कायम ठेवणार असल्याचा मानस गौडा यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये आणखी पारदर्शकता राहण्यासाठी जिओ टॅगिंग ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष झालेल्या कामाचे स्वरुप ध्यानात येणार आहे. चुकीच्या पध्दतींना थारा न देता उपलब्ध निधीतून चांगल्या दर्जाची कामे होण्यास प्राधान्य देणार असल्याचे विनय गौडा यांनी सांगितले.
सन 2009-10 पासून केंद्र शासन पुरस्कृत असणारा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट केला आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना “हर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत प्रत्येक घरात वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे. 2024 पर्यंत ही योजना पूर्णत्वास येणार आहे. प्रत्येक कुटुंबास प्रतिदिन 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी देण्यात येणार आहे. प्रत्येक घरात नळकनेक्शन देण्यासाठी बेसलाईन सर्व्हेक्षण करुन पुढील चार वर्षांचे नियोजन करण्यात आले आल्याचे विनय गौडा यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात एप्रिल 2020 अखेर 5 लाख 77 हजार 43 कुटुंबांपैकी 3 लाख 8 हजार 159 कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आलेली आहेत. आजअखेर 2 लाख 68 हजार 884 पैकी 33 हजार 759 कुटुंबांना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नळ कनेक्शन दिली आहेत. 2 लाख 35 हजार 125 कुटुंबांना आगामी काळात नळ कनेक्शन देण्यात येत आहेत. “हर घर नल से जल’ या योजनेअतर्गत सन 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पंपिंग मशिन वाढवणे, अतिरिक्त नळ पाणी पुरवठा योजना करण्यासाठी आगामी चार वर्षात सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे विनय गौडा यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे. जिल्हा परिषदेचा संपूर्ण देशात नावलौकिक आहे. अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली याचे निश्चितच समाधान आहे. जलद कामाची सवय या जिल्ह्याला असून प्रत्येक विभागाची परिपूर्ण माहिती घेतल्यानंतर कामात आणखी गतीमानता आणणार आहे. पदाधिकारी, अधिकारी यांचे चांगले सहकार्य आहे. सर्वांशी समन्वय साधून सातारा जिल्ह्याला, जिल्हा परिषदेला साजेशे असे काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यास प्राधान्य देणार असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून योजना राबवण्यास प्राधान्य देणार आहे.
विनय गौडा
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा