नवी दिल्ली – अमेरिकेत खलिस्तानी कट्टरवादी गुपरतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या कट प्रकरणी अमेरिका भारताच्या संपर्कात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे.
भारतानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. एका संस्थेने आयोजित केलेल्या वार्तालापादरम्यान त्यांनी हे प्रतिपादन केले.
लाल समुद्रात हौथींच्या हल्ल्यांमुळे धोक्यात आलेल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारताने घेतलेल्या भूमिकेचे देखील अमेरिकेने कौतुक केले आहे. लाल समुद्रामध्ये भारतीय नौदलाकडून जी काही दक्षता बाळगली जाते आहे, ती निश्चितच कौतुकास्पद आहे. असेही वर्मा म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये भारतीय नौदलाने अरबी समुद्रात सागरी चाच्यांच्या हल्ल्यांमुळे अडचणीत आलेल्या अनेक जहाजांना सुरक्षा पुरवली आहे. लाल समुद्रात हौथींच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्चया आघाडीमध्ये सामील न होता भारताने ही कामगिरी केली आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांनी एक वेगळी उंची गाठली आहे. काही वर्षांपूर्वी कोणीही या उंचीवरच्या संबंधांचा अंदाज करू शकले नसते, असेही वर्मा म्हणाले.