शिर्डी : एकनाथ शिंदे जे काही करतो ते खुलेपणाने करतो. जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो. मला कुठलीही भिती नाही. दबावापोटी नाहीतर शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. संजय राऊतसारख्या पळकुट्या लोकांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार काय ? असा टोला लगावला.
शिर्डी येथे महायुतीतील विविध प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. विरोधक इतर राज्यात जिंकले तेव्हा ईव्हीएम बरोबर असते मात्र जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतात, अशी विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. आता तर सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतआहे. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाला सल्ले देत होते. लोक घरी बसणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्यांना मतदान करतील. आम्ही सुडबुद्धीने कारवाई करत नाही. महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली. सरकार वाचवण्यासाठी आणखी ते काही लोकांना जेलमध्ये टाकणार होते, असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.
खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली, असे शिंदे यांनी स्पष्ट करीत ” ये जनता है सब जानती है’ अशी मिश्किल टिप्पणी केली. यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे मंत्री, मंत्री दादा भुसे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.