लखनौ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मंगळवारी उत्तरप्रदेशातील विशेष न्यायालयाने मानहानी प्रकरणी जामीन मंजूर केला. संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला होईल. कर्नाटकमधील मागील विधानसभा निवडणुकीवेळी (वर्ष २०१८) राहुल यांची बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद झाली.
त्यावेळी त्यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणावर विश्वास असल्याची भूमिका भाजपकडून मांडली जाते.
मात्र, त्या पक्षाचे अध्यक्ष हत्या प्रकरणातील आरोपी आहेत, असे त्यावेळी राहुल यांनी म्हटले होते. त्या टीकेवर आक्षेप घेत भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये राहुल यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली.
राहुल यांनी केलेल्या टीकेच्या ४ वर्षे आधीच न्यायालयाने शहा यांना आरोपमुक्त केल्याचे मिश्रा यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी दाखल केलेल्या प्रकरणावरून राहुल सुलतानपूरमधील विशेष न्यायालयात हजर राहिले. जामीन मंजूर करत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.