कराड – देशाची अखंडता टिकावी यासाठी गांधी व नेहरूच्या घराण्याने केलेला त्याग विसरता येणार नाही. त्यांच्यामुळे सामान्य माणूस सत्तेत आला, निर्भय बनला; परंतु गेल्या पाच वर्षांत खोटा इतिहास रंगवून देशाची संस्कृती बिघडण्याचे काम होत आहे.
गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या विचारसरणीने मी कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेला आत्मसन्मान मिळवून दिला. रचनात्मक विकास केला. मात्र, गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाची घडी उद्ध्वस्त करण्याचे काम विरोधकांनी केले आहे, असा आरोप माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रयत संघटनेचे उमेदवार ऍड. उदयसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ थोरात मळा, शेरे पाटी व शेरे स्टेशन येथे झालेल्या प्रचार बैठकांमध्ये ते बोलत होते. अंकुश निकम अध्यक्षस्थानी होते. “कृष्णा’चे माजी संचालक बाळासाहेब निकम, खरेदी-विक्री संघाचे संचालक संभाजीराव निकम, लालासाहेब पवार, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे संचालक कृष्णत सातपुते, शिवाजीराव जाधव, बाजार समितीचे संचालक जगदीश निकम, रेठरे बुद्रुकचे सुरेश मोहिते, प्रतापराव कणसे, आबासाहेब कणसे, अंकुश कणसे, सचिन कणसे, बनुताई येलवे यांची उपस्थिती होती. विलासकाकार उंडाळकर म्हणाले, प्रत्येक गावात मी पहिल्यांदा विकासकामे केली. सर्वसामान्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून माझे व सहकाऱ्यांचे काम अव्याहतपणे सुरू आहे. कृष्णाकाठच्या लोकांनी कोणतेही दडपण न ठेवता निर्भय रहावे.
तुमचा नैतिक अधिकार विसरू नका. झेंडा एका पक्षाचा आणि काठी दुसऱ्याची हे आजकालच्या नेत्यांना सत्तेच्या नादात कळत नाही. देशातील गरीब जनतेला भाकरी मिळत नाही. दलित, मुस्लिम व बहुजन समाज अस्थिर झाला आहे. ही विषमता दूर करण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवा. आमचा कोणत्याही व्यक्तीला विरोध नसून विचारांना विरोध आहे. कृष्णात सातपुते यांनी आभार मानले.