Arvind Kejriwal| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात केलेल्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी होणार आहे. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.
केजरीवाल यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, या प्रकरणात त्यांची अटक ही बेकायदेशीर असून हा मुक्त आणि निष्पक्ष लोकशाहीच्या तत्त्वांवर अभूतपूर्व हल्ला आहे. या खटल्यातील त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू झाली तेव्हा त्यांच्या अटकेची पद्धत आणि वेळ चुकीची आहे.
तसेच आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना चिरडण्यासाठी मोदी सरकारने ईडी आणि त्याच्या व्यापक अधिकारांचा गैरवापर केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपणास जाणूनबुजून अटक करण्यात आली असून अटकेमुळे पीएमएलए कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचा युक्तिवाद केजरीवाल यांनी याचिकेत केला आहे. Arvind Kejriwal|
दरम्यान, केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केल्यानंतर सध्या ते तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता पक्षाची प्रचार मोहीम पुढे नेण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. त्या शनिवारी दिल्लीतील पहिल्या रोड शोमध्ये सहभागी झाल्या होता. रोड शोवेळी त्यांनी दिल्लीकरांना उद्देशून भाषण केले. शाळा, मोहल्ला क्लिनिक्सची उभारणी केल्यामुळे आणि मोफत वीज पुरवल्यामुळे केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा:
पाकिस्तान, चीनमध्ये निसर्गाचा कोप ! दोन्ही देशात वादळाचा तडाखा, आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू