मुंबई – नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तातडीने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याचे सूचित होत आहे. शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत भाषण करताना जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली. त्यावरून ठाकरे यांनी शिंदेंना लक्ष्य केले. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. तिला ब्रेक नव्हता. त्यामुळे अपघात तर होणार नाही ना असे टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली. तसेच ते पुढे म्हणाले,’काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेने आयोजित केली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. ते पुढे म्हणाले,’बंडखोर हे गद्दार आहे. एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यांत विकृत हास्य आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यांतले अश्रू आहेत. त्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार, असा शब्दांत ठाकरे यांनी बंडखोरांना इशारा दिला.
राज्यातील सत्ताबदलानंतर शिवसेनेच्या डागडुजीसाठी ठाकरे सरसावले आहेत. त्यातून त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी मंगळवारी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. सत्ताबदलानंतरही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्याचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले गेले ते अजूनही सोबत आहेत. मात्र, ज्यांच्यावर विश्वास ठेवून मी निवांत होतो; त्यांनीच विश्वासघात केला. या सगळ्यांतून मी मार्ग काढणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.