ओटावा – कॅनडात सक्रीय असलेल्या खलिस्तानवादी गटंकडून भारतविरोधाची मर्यादा ओलांडली जाते आहे. हा मुद्दा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे ही मर्यादा ओलांडण्यात येऊ नये, असा स्पष्ट इशारा कॅनडातील भारतीय उच्चाधिकारी संजय कुमार वर्मा यांनी दिला आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून तिघा भारतीयांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला. हे प्रकरण देशांतर्गत गुन्हेगारीशी संबंधित आहे, असा दावा देखील वर्मा यांनी केला आहे.
कॅनडात स्थायिक शीख गट भारतातील भूमीतून फुटून वेगळ्या खलिस्तान देशाच्या निर्मितीसाठी करत असलेल्या कारवाया म्हणजे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषययीची मर्यादा ओलंडणे आहे. भारताचे भविष्य काय असावे, याचा निर्णय भारतीय करतील. परदेशी करू शकणार नाहीत, असे वर्मा म्हणाले.
कॅनडातील मॉन्ट्रीयल कौन्सिल या प्रसिद्ध थिंक टँकच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि कॅनडादरम्यानच्या संबंधांमध्ये कटुता आली असली, तरी हे संबंध सकारात्मक आहेत. मतभेद दूर करण्यासाठी आम्ही केंव्हाही चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही ही चर्चा करत देखील आहोत.
दशकभर जुन्या मुद्यांवरून कॅनडामध्ये निर्माण झालेल्या गैरसमुजुतीमुळे सध्याचा तणाव निर्माण झाला आहे. ही गैरसमुजूत भारतीय वंशीय कॅनडीयन नागरिकांनी पुन्हा जूने मुद्दे उकरून काढल्यामुळे झाली आहे, असेही वर्मा म्हणाले.
दुसरा मुद्दा म्हणजे भारताला राष्ट्रीय सुरक्षेविषयी जाणवणारी चिंता आहे. भारताला दुहेरी नागरिकत्व मान्य नाही. त्यामुळे जो कोणी स्थलांतरित होतो, तो भारतासाठी परदेशी आहे. अशा परदेशी व्यकीतीने भारताबद्दल वाईट हेतू बाळगणे भारतासाठी धोक्याचे आहे, असेही वर्मा म्हणाले.
कॅनडातील भारतीय उच्चाधिकाऱ्यांच्या सुरक्षेविषयी भारताला चिंता वाटते आहे. याची कॅनडाने दखल घ्यायला हवी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गटांना, व्यक्तींना आणि फुटिरवादी गटांना कॅनडामध्ये सुरक्षित आश्रय दिला जाऊ नये. कॅनडा सरकारने आपल्या जबाबदाऱ्या ओळखाव्यात आणि त्याचे पालन करावे, अशीच आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.