Girish Mahajan On Uddhav Thackeray – आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते का? असा सवाल मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला.
गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटले का? ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते.
आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावे का? आमच्या भरवशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार कुणाच्या भरशावर निवडून आले होते? आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे.
तसेच गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, कधी पावसात भिजायचे, कधी रडायचे, कधी आजारी पडायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणे उचित होणार नाही. मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत, असा टोला त्यांनी लगाविला.