नवी दिल्ली – उद्योगपती अंबानी आणि अदानी यांनी कॉंग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठवले का याची चौकशी करा. त्यासाठी त्यांच्याकडे ईडी, सीबीआय पाठवा, असे आव्हान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
एका सभेत बोलताना मोदींनी अंबानी आणि अदानी यांच्यावरील टीका अचानकपणे का थांबवली, असा सवाल करत कॉंग्रेसला आणि विशेषत: राहुल यांना लक्ष्य केले.
त्यावर राहुल यांनी सोशल मीडियावर स्वत:चा व्हिडीओ अपलोड करून प्रत्युत्तर दिले. मोदीजी, आपण घाबरले आहात का? एरव्ही तुम्ही अंबानी आणि अदानींविषयी बंद दाराआड बोलता. प्रथमच तुम्ही त्यांच्याविषयी जाहीरपणे बोलला आहात.
ते टेम्पोने पैसे पाठवत असल्याचा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का, असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि हेल्पर कोण आहेत ते देशाला ठाऊक आहे. मोदींनी दोन उद्योगपतींना जेवढे पैसे दिले; तेवढेच पैसे कॉंग्रेस विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला देईल, अशी पुस्तीही राहुल यांनी जोडली.