नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयीचा निर्णय राखून ठेवला. आता तो फैसला न्यायालय १० मे यादिवशी जाहीर करणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळणार का या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने २१ मार्चला केजरीवाल यांना अटक केली. सध्या ते तिहार तुरूंगात आहेत. त्यांनी अटकेच्या कारवाईला आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणीस विलंब होऊ शकतो.
त्या बाबीचा विचार करून आणि लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही याविषयी निर्णय घेण्याचे सूतोवाच केले.
आता तो निर्णय शुक्रवारी देण्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. अंतरिम जामीन मिळाल्यास ती बाब केजरीवाल यांना मोठा दिलासा देणारी ठरेल. त्यामुळे ते आपच्या प्रचारात सहभागी होऊ शकतील. साहजिकच, न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागणार आहे.