नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. यंदा काँग्रेस 328 जागांवर निवडणूक लढत आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 421 जागांवर उमेदवार दिले होते. यंदा काँग्रेसने केवळ 330 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यातील दोन उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्यांची संख्या 328 वर आली आहे. देशभरात काँग्रेस कमी जागांवर निवडणूक लढत असली तरी कर्नाटक, ओडिशा आणि मिझोरम या राज्यांमध्ये 2019 च्या तुलनेत अधिक जागांवर निवडणूक लढवत आहे.
कर्नाटकमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसने 21 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेस सर्व जागांवर म्हणजेच 28 जागांवर उमेदवार दिले आहे. दुसरीकडे ओडिशामध्ये देखील सर्वच्या सर्व 20 जागांवर काँग्रेस लढत आहे. काँग्रेसने 2019च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत. 2019मध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने 67 जागा लढवल्या होत्या. यावेळी काँग्रेस केवळ 17 जागा लढत आहे.
म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने 50 जागा यावेळी कमी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने २०१९च्या तुलनेत २६ जागा कमी करत केवळ १५ जागा लढवत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 40 जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्रात 2019ला काँग्रेसने 25 जागा लढवल्या होत्या. आता महाविकास आघाडीत काँग्रेस 17 जागा लढवत आहे.
दरम्यान, काँग्रेसने इंडिया आघाडीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आघाडी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी आहे. काँग्रेसची दिल्ली आणि हरियाणात आम आदमी पार्टी सोबत आघाडी झाली आहे. याशिवाय देशभरात इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षांना देखील काँग्रेसने जागा सोडल्या.
लोकसभा निवडणूक वर्षे कॉंग्रेसचे उमेदवार
2004 – 417
2009 – 440
2014 – 464
2019 – 421