Sanjay Raut : महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हे विधेयक त्वरित लागू करायला हवे, अशी मागणी केली. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर देताना वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाला तर असा खोचक सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “महिला आरक्षणाच्या (Women’s Reservation Bill) मुद्द्यावर शिवसेनेच्या भूमिकेवर आम्ही स्पष्टीकरण दिलं आहे. महिलांसाठी सरसकट ३३ टक्के मतदारसंघ राखीव करण्यापेक्षा राजकीय पक्षांवर ३३ टक्के महिला निवडून आणण्याची जबाबदारी टाकावी, बंधन टाकावं अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती.” असे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी “अमित शाह चेष्टेने असं म्हणाले की, उद्या वायनाड मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यावर तुम्ही आमच्यावर आरोप कराल. मात्र, ते काहीही करू शकतात. त्यांच्या हातात निवडणूक आयोग आहे. ते वायनाड मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करू शकतात. अशाप्रकारे लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये बसलेले पुरुष नेते पुन्हा निवडून येऊ नये यासाठी हे विधेयक घाईत आणलं आहे,” असा आरोप यावेळी त्यांनी केला.
त्यासोबतच, “असे अनेक नेते आहेत जे विरोधी पक्षात आहेत किंवा भाजपात असतील, त्यांना या विधेयकामुळे सभागृहात येणं कठीण होईल. असं असलं तरी आम्ही सर्वांनी महिलांचा सन्मान, महिलांना अधिकार म्हणून आम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे,” असेही संजय राऊतांनी यावेळी म्हटले.
भावना गवळींच्या मंत्रिमंडळातील महिलांच्या आरक्षणाविषयी (Women’s Reservation Bill) वक्तव्यावर संजय राऊत, “ती त्यांची भूमिका असू शकते. कर्तबगार महिला सरपंचपदापासून संसदेपर्यंत आपल्या कर्तबगारीवरच निवडून येत असतात. कर्तबगार महिलांना कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही हा आमचा अनुभव आहे.” असे त्यांनी म्हटले.