पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे, त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत,’ असे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी येथे दिले.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, “मी महापौर असताना 22 सप्टेंबर 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हे धरण टाटा कंपनीचे आहे. कंपनीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. तसेच समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे.
या योजनेतील 82 पैकी 51 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, 20 टाक्यांचा वापर सुरू झाला आहे. बाराशेपैकी 921 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून, वितरण वाहिन्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक पाण्याचे मीटर्स बसविण्यात आले आहेत. या योजनेमुळे पाण्याची गळती कमी होणार असून, पुणेकरांना शुद्ध, पुरेसा आणि चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकेल असा विश्वास वाटतो.
“नगर रस्ता, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी, संगमवाडी या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आली. या धरणातून 2.8 टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. 2041 च्या लोकसंख्येचा विचार करून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे,’ असेही मोहोळ यांनी सांगितले.