पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सूर्यनारायण तापले असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यांतील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. असह्य करणारा उन्हाचा चटका उष्माघात ठरू शकतो. दरम्यान, शुक्रवारी (दि. 28) राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, या महिन्यात दुसऱ्यांदा उच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे.
वातावरणातील खालच्या थरातील द्रोणिका रेषा आज पूर्व विदर्भापासून उत्तर केरळपर्यंत, मध्य महाराष्ट्र कर्नाटकावरून जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोकण- गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, दि. 29 आणि 30 या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानंतर राज्यातील हवामान कोरडे राहणार असून, कमाल तापमान वाढणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दुपारी घराबाहेर पडू नये
गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कमी पाऊस, कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे कमाल तापमान वाढत आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असून, ठाणे, रायगड, पालघर, मुंबईत उष्ण, दमट वातावरण राहील. पुणे शहरातही तापमान वाढेल. त्यामुळे सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत उन्हाचा चटका अधिक जाणवेल. त्यामुळे आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी केले आहे.
राज्यातील काही प्रमुख भागांतील कमाल तापमान
सोलापूर – 43.7, परभणी – 42.8, नांदेड – 42.4, जळगाव – 42.2, चंद्रपूर आणि वाशिम – 41.8, यवतमाळ – 41.5, पुणे आणि अकोला – 41.3, नाशिक – 41.2, सांगली – 41, छत्रपती संभाजीनगर – 40.7, सातारा – 40.5, कोल्हापूर आणि ब्रह्मपुरी – 40.2.