पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेशासाठी आतापर्यंत राज्यातील केवळ ४६ हजार ६३० पालकांनीच आपल्या बालकांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पालकांनी प्रवेश अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास १६ एप्रिलपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ७६ हजार ५३ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांमध्ये ८ लाख ८६ हजार ४११ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या जागांचा विचार करता अद्यापपर्यंत फारशी अर्ज नोंदणीच झालेली नाही. आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत यंदा बदल करण्यात आलेला आहे. खासगी विनाअनुदानित शाळांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळाही या प्रवेश प्रक्रियेत आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांकडून आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी निरुत्साह दिसत आहे.
दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी सुमारे एक लाखापर्यंत जागा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. या सर्व जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील होत्या. पालकांना इंग्रजी शाळांबाबत आकर्षणही असायचे. हे आताही कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा प्रवेशाच्या जागा खुप प्रमाणात वाढल्या असल्या, तरी प्रवेश अर्ज संख्या मात्र खूपच कमी झाली आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार करत असताना ५ हजार २०६ शाळांमध्ये प्रवेशासाठी ७३ हजार २६३ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी केवळ १३ हजार ४१३ अर्ज नोंदणी झाली आहे. नागपूर – ६२४०, नाशिक – ३३९४, ठाणे – 3४१३, छत्रपती संभाजीनगर – २७४६, मुंबई – १७८१, जळगाव – ११३९, बीड – १०३८, सिंधुदुर्ग – ६, गडचिरोली – ७३, नंदुरबार – १३१ याप्रमाणे अर्ज काही जिल्ह्यांतील अर्ज नोंदणी नमूद करण्यात आली आहे.
टेबल करणे – आरटीई प्रवेशाची मागील काही वर्षांतील स्थिती
शैक्षणिक वर्ष – प्रवेश क्षमता- झालेले प्रवेश – रिक्त जागा
२०२०-२१ – ११५६४० – ८६९४५ – २८६९५
२०२१-२२ – १०३२४२ – ७२१६० – ३१०८२
२०२२-२३ – १०१९०६ – ७८७४४ – २३१६२
२०२३-२४ – १०१८४६ – ८२७६३ – १९०८३