पिंपरी,(प्रतिनिधी) – एप्रिल महिना संपायला आला तरी ग्राहकांना आंबे खरेदीसाठी फारसा प्रतिसाद नाही. अवकाळी पावसामुळे या आंबे खरेदीसाठी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसून पावसाळी वातावरणात आंबा खाऊ नये, त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात,असा समज आहे. परिणामी एप्रिल महिना संपायला आला तरी आंब्याच्या विक्रीने जोर पकडलेला नाही. आता विक्रेत्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा आहे.
एप्रिल महिना संपायला आला आहे. बाजारात विविध जातीचे आंबे विक्रीसाठी आलेले आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाळी वातावरणामुळे अद्याप आंब्याना मागणी नसल्याचे फळबाजारातील चित्र आहे. आंब्यांमध्ये हापूसचा दर प्रती डझन 800 ते 1200 रुपये आहे.
गेल्या महिनाभरापासून आंब्याची आवक सुरू आहे. बाजारपेठेतील आंबे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या फळबाजारात देवगडचा हापूस, बेंगळुरूचा लालबाग, दशेहरी आंबा उपलब्ध आहे. दशेहरी 150 ते 160 रुपये, लालबाग 200 रुपये प्रतिकिलो दरानेविक्री सुरू आहे.
आंबा सिझनचा विचार करता सुट्यांचा महिना असलेल्या एप्रिलमध्ये दुसर्या आठवड्यापासून आंब्याची विक्री जोरात होते. मात्र अवकाळीच्या हजेरीने अपेक्षित संख्येने ग्राहकांकडून आंबा खरेदी होत नसल्याचे चित्र आहे.
येत्या पंधरा दिवसांत आंब्याच्या विविध प्रजाती बाजारात येऊन दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. अद्याप पायरी, लंगडा या प्रजाती उपलब्ध झालेल्या नाहीत.
केशर, जुनागढ केशर यासह गुजरातमधील केसर, बनराज, दक्षिण भारतातील नीलम, रुमानी आंब्याची प्रतीक्षा कायम आहे. हापूसच्या तुलनेत हे आंबे मोठे असतात. दरवर्षी या आंब्यांनादेखील चांगली मागणी असते. व्यापार्यांच्या मते, अक्षय्य तृतीयेनंतर आंब्याची विक्री अधिक जोर पकडण्याची शक्यता आहे.