कराड -सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारच्या कारभाराबद्दल काही बोलायचीच सोय नाही. महाभकास आघाडीचे हे सरकार फक्त घोषणा करते, पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे. अशा या भंपक सरकारविरोधात राग व्यक्त करण्याची संधी पदवीधर व शिक्षक मतदारांना लाभली आहे.
या निवडणुकीत महाभकास आघाडीच्या भंपक सरकारला धडा शिकवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.
पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व अनेक वर्षे मी केले आहे. शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न, युवकांचा कौशल्य विकास व्हावा यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय माझ्या काळात यशस्वीपणे अंमलात आणले गेले. भाजपाचे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या घराण्याला समाजकारणाचा मोठा वारसा आहे. तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा धडाडीच्या युवा कार्यकर्त्याला तसेच शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना पहिल्या पसंतीची मते देऊन निवडून आणावे.
म्हणे, आघाडीचे सरकार स्वतः मुळेच आले. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:मुळेच आले, असे कराड तालुक्यातील एकाफ नेत्याला वाटतेय. पण स्वत:च्याच राज्य सरकारात या नेत्याला संधी न मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर नाहक टीका करण्याचा एकमेव अजेंडा त्यांच्याकडे शिल्लक आहे, अशी बोचरी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता डॉ. भोसले यांनी केली.