नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी आपचे प्रमुख केजरीवाल यांना अटक केली.
आता आपचेच माजी आमदार संदीप कुमार यांनी केजरीवाल यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. अटकेमुळे केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचे कामकाज सांभाळण्यास राज्यघटनेनुसार असमर्थ ठरल्याची भूमिका याचिकेतून मांडण्यात आली आहे.
तुरूंगात असताना केजरीवाल घटनात्मक अधिकारानुसार कामकाज चालवू शकणार नाहीत, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याआधी केजरीवाल यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या.
त्यामुळे नव्या याचिकेबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे. केजरीवाल सध्या तिहार तुरूंगात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. मात्र, केजरीवाल मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. ते तुरूंगातून कामकाज पाहतील, अशी ठाम भूमिका आपने स्वीकारली आहे.