पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दोनशे वर्षांतील जमिनीबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. जमीन केवळ आर्थिक संसाधन मानली गेली आहे.जास्तीत जास्त उत्पादन हे उद्दिष्ट बनत असून त्यामुळे पृथ्वीमातेचे शोषण सुरू आहे. सध्या आपल्या जमिनीची स्थिती चिंताजनक आहे. आज देशात ९६.४० दशलक्ष हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास ३० टक्के क्षेत्र नापीक आहे.
हे चित्र सुधारण्यासाठी अक्षय कृषी परिवाराने पुढाकार घेतला आहे. यात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात १५० गावांमध्ये भूमी सुपोषणासाठी भूमीचे पूजन आणि व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. ही माहिती कृषीभूषण जगन्नाथ मगर यांनी दिली. यावेळी गोसेवा गतीविधी प.महाराष्ट्र प्रांत गो-आधारीत शेती सहप्रमुख पूनम राऊत उपस्थित होत्या.
भारतातील शेतजमिनीची घटती कार्बन पातळी वाचविण्यासाठी आणि जमीन नापीक होत चालली आहे, यासाठी देशातील विविध प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन भूमी सुपोषणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाद्वारे मृदा पोषण आणि संवर्धन कार्याला चालना देण्यात आली आहे. २०२१ पासून जमीन पोषण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक मोहीम सुरू केली होती.
या सार्वजनिक मोहिमेत कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाद्वारे मृदा पोषण आणि संवर्धन कार्याला चालना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सध्या सर्वत्र उपलब्ध पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालला असून पुढील पाच वर्षांत आपण नैसर्गिक शेती करण्याचा मार्ग स्वीकारला नाही, तर पाणी उपलब्धतेची समस्या अजून गंभीर बनेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जमिनीबाबत जागरूक होऊन रसायनमुक्त शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
नागरिकांना आवाहन
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपल्याला जाणवत आहेत, सर्वांच्या आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होत असून मानावाबरोबरच जनावरांना सुद्धा त्याचा त्रास होत आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण खात असणारी प्रत्येक गोष्ट रासायनिक होत चालली आहे. झटपट पिकाच्या नादात मात्र आपल्याला अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी आपलीच भूमी सुपीक, सुपोषित असणे आपले कर्तव्य आहे या भावनेतून शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.